ठाणे : ‘माणसांनी तांत्रिक बाबींमध्ये प्रगती केली खरी; पण त्याचसोबत गेल्या काही वर्षांपासून आलेल्या आधुनिकतेने आपल्यातील संस्कार हिरावले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियामुळे देशाचे भविष्यनिर्माते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीसह आपल्याही संवेदना, गांभीर्य कमी होत आहे,’ अशी खंत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेते व हिंदी कवी शैलेश लोढा यांनी व्यक्त केली. ठाण्यात नुकत्याच झालेल्या राजस्थान महोत्सवात ते बोलत होते.
‘मारवाडीज इन ठाणे वेल्फेअर’ संस्थेच्या वतीने सर्व राजस्थानी समाजाला एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने ‘राजस्थान महोत्सव २०१९’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा व महाराष्ट्र कॉंग्रेसच्या सरचिटणीस सुमन अग्रवाल यांच्या पुढाकाराने गडकरी रंगायतनमध्ये आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते झाले. या वेळी राजस्थानमधील चुरू येथील नवनिर्वाचित आमदार व आंतरराष्ट्रीय अॅथलीट पद्मश्री कृष्णा पूनिया आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे चिटणीस बी. एम. संदीप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट गणेश पाटील, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे, उल्हासनगरचे कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
मारवाडी समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर होती. यामध्ये ज्येष्ठ उद्योगपती-समाजसेवक दीनदयाल मुरारका, रमाकांत परसरामपुरिया, एस. एल. पोखरणा, राधेश्याम अग्रवाल, अमर ठाकुर, एल.व्ही.राठी, विक्रम जैन, संदिप गर्ग, डॉ. राजेंद्र अग्रवाल, शिवकांत खेतान, महेश अग्रवाल, विकास केडिया, सुरेंद्र रुईया, ब्रिज मित्तल, उत्तम जैन, सुरेश राठोड, चंचल झंवर, अभिनेत्री गरिमा जैन, सीमा नैयर, ‘प्रजापिता ब्रह्मकुमारी’च्या लतिका दीदी आणि ‘टाइम्स अँड ट्रेंड्स अॅकेडमी’च्या संचालिका निकिता अग्रवाल, वीरेंद्र पूनिया आदींचा समावेश होता.
या वेळी ज्येष्ठ समाजसेवक-उद्योगपती सत्यनारायण बजाज यांना संस्थेच्या वतीने मानाचा मारवाड रत्न व अनिता टिबरेवाल यांना महिला उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेच्या या वर्षीच्या स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.
‘मुंबई-ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या प्रगतीत या राजस्थानी समाजाचा सिंहाचा वाटा आहे. शूर-शिरोमणी अशी ओळख असलेल्या महाराणा प्रताप यांच्या भूमीतून छत्रपती शिवरायांच्या या संतभूमीवर येऊन आपली कर्मभूमी बनविणाऱ्या या समाजाचे कर्तृत्व असामान्य आहे,’ अशा शब्दात कृपाशंकर सिंह यांनी या समाजाचे कौतुक केले. राजस्थानी समाजास एकत्रित आणण्यासाठी २०११ पासून राजस्थान महोत्सवाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सुमन अग्रवाल आणि सहकाऱ्यांच्या कार्याची त्यांनी मुक्तकंठानी प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुमन अग्रवाल यांनी संस्थेच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. या सोहळ्यात राजस्थानी कला-संस्कृतीची झलक प्रस्तुत करणारे विविध रंगीबेरंगी कार्यक्रम सादर करण्यात आले. ‘एक शाम शैलेश लोढ़ा के नाम’ नावाने एक कविसंमेलनही झाले. यामध्ये शैलेश लोढ़ा यांच्यासह दिनेश दिग्गज, डॉ. सुरेश अवस्थी, पार्थ नवीन आदींनी कविता सादर केल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमाशंकर रुंगटा, राजेंद्र तापड़िया, रामप्रकाश अग्रवाल, ओम सोमानी, मंजूर खत्री, किशन बिश्नोई आदींनी प्रयत्न केले.